रविवार, ४ जुलै, २०१०

मर्मबंधातली ठेव ही!

रोज दुपारी अवनीला शाळेतुन घरी घेऊन येताना letter box मधे डोकवायचं, काही पत्र असतील तर घ्यायची, हा माझा आणि अवनीचा शिरस्ता! हल्ली पत्र म्हणजे काय तर सगळी छापील बीलं नाहीतर कसली तरी माहिती पत्रकं. किती दिवस झाले कुणाचं हस्ताक्षरातलं पत्र आलेलं नाही. मी सुद्धा कोणाला पत्र लिहिलं, त्याला सुद्धा किती दिवस झाले. मागच्या चार पाच वर्षांपर्यंत भारतातून पत्र येत होती. आईची, मावशी-आत्याची, आणि माझ्या मैत्रिणीची आरतीची! अगदी खुप नियमीत नाही पण निदान अधून मधून तरी. मी सुद्धा उत्साहानी लिहायची तेंव्हा. आता सगळीकडे फोन आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे रोजच्या रोज इ-मेल आणि वरचेवर फोन होतातच. मग कशाला येत्ये पत्र लिहायची वेळ?
मला अजुन आठवतय लहानपणी आम्ही काय वाट बघायचो पोस्टमन काकांची! घराच्या खिडकीत बसून लांबवर नजर ठेवायची बरोबर सकाळी ११ वाजता. मग ते काका दिसले की विचारायाचो "काकाssss, दाते आहे?" किंवा कधीकधी आम्ही विचारायच्या आत तेच पुकारा करायचे "दातेsssssss!".
आमचं एकत्र कुटुंब. आणि आमच्या मावश्या, दोन आत्या, आजी आजोबा असे बरेच जणं पुण्याच्या बाहेर होते. त्यामुळे बरेचदा कुणाचं न कुणाचं पत्र असायचंच. आमच्या सगळ्यांच्या वाढदिवसांना, आईबाबांच्या आणि काका-काकुच्या लग्नाच्या वाढदिवसाला कोणाकोणा नातेवाइकांची पत्र यायची. तशीच कधी नुसती खुशालीची पत्र तर कधी खुशखबर देणारी पत्र. परिक्षा जवळ आली की मुंबईची आत्या आम्हा सगळ्या भावंडांना शुभेच्छा द्यायला हमखास पत्र लिहायची. "मन शांत ठेउन पेपर लिहा. प्रश्नपत्रिका नीट वाचा. बरोबर extra पेन-पेन्सिल असु देत. उत्तरं नीट तपासून पहा" असा अगदी ठरलेला मजकुर असायचा. त्यावरून आम्ही भावंडं चेष्टाही करत असु. पण आम्हाला तिचं पत्र आलं की परीक्षेला जाताना छान वाटायचं. मग रिझल्ट लागल्यावर तिचं शाबासकीचं पत्र यायचं.
आईची एक मैत्रिण अमेरिकेला असते. तिचीसुद्धा आईला अधुन मधुन पत्र येत. आईकडे तिच्या पत्रांचा एक गठ्ठा जपून ठेवलेला होता. कधीतरी आई ती पत्र वाचत बसायची. त्यामुळे मला सुद्धा स्वतःला आलेली पत्र जपून ठेवायची सवय लागली ती आजपर्यंत! पत्र पाठवणं, मग आपल्या पत्राला उत्तर येण्याची वाट बघणं, आलेली पत्र परत परत वाचणं ह्यातली एक वेगळीच गंम्मत मी अनुभवायला लागले.
आज अनेक दिवसांनी जुन्या पत्रांचं ते सगळं बाड बाहेर काढलं. एकेक पत्र घेऊन वाचायला लागले. या पत्रांना कसं छान आपापलं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाच्या अक्षराचं वळण वेगळं, लिहिण्याची स्टाइल वेगळी, भाषेचा बाज वेगळा, इतकंच काय तर शाई सुद्धा वेगळी असते. आधी आईच्या पत्रांचा गठ्ठा घेउन वाचून काढला. आम्हाला तिघांना वाढदिवसाला शुभेच्छा देणारी, गरोदरपणात मी इथे एकटी म्हणून मला सूचना देणारी, अनेक पाककृती लिहून पाठवणारी आई भेटली. आई कधीच फारसं शब्द-बंबाळ किंवा इमोशनल बोलत/लिहित नाही. त्यामुळेच खरं तर तिची पत्र परत परत वाचावीशी वाटतात. तशीच काका, काकू, आत्त्या, मावश्यांची पत्र! मी भावंडांमधे सगळ्यात लहान. त्यामुळे अजुनही बरेचदा प्रत्यक्षात आणि पत्रातही सगळ्यांची तीच भावना दिसते. आजही त्यांची पत्रं मला थेट लहानपणातच नेवून सोडतात. आपल्यावर वेगावेगळे संस्कार करणारी, आपल्या अनेक छोट्या मोठ्या यशामधे आपलं कौतुक करणारी, कठीण काळात आपल्या बरोबर असणारी एवढी माणसं देवानी आपल्याला दिल्येत ह्या बद्दल, माझ्या या माणसांना "वाचताना" आज पुन्हा एकदा कृतज्ञता वाटली. माझ्या ह्या खजिन्यात अजुन एका व्यक्तीनी मोलाची भर घातली ती म्हणजे माझी मैत्रिण आरती. तिनी मला इतक्या वर्षात असंख्य पत्र लिहिली होती. काही वर्षांपूर्वी अनपेक्षितपणानी या जगातून ती निघून गेली. पण तिची सगळी जुनी पत्र वाचताना ती आजही मला भेटते. तिच्या आठवणी तर आहेतच मनात. पण त्या सगळ्या तिची जुनी पत्र वाचताना पुन्हा पुन्हा ताज्या होतात.
या सगळ्या जुन्या पत्रांना एक छानशी ऊब आहे, अगदी आजीच्या साडीच्या गोधडी सारखी. जी इ-मेल, ऑरकुट स्कॅप वाचताना कधीच जाणवत नाही.
हल्ली तर नवरयानी सगळी जुनी पत्रं स्कॅन करून ठेवल्यामुळे हा गठ्ठा नाही ठेवला तरी चालेल असं त्याला वाटतं. पण ती स्कॅन केलेली पत्रं मला त्यांचा उबदार स्पर्श कसा देतील?

"आई तुला पत्राची वाट बघायला इतकं का आवडतं?" अवनीच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून तिला सुद्धा या आठवणींचा ठेवा जतन करायची सवय लावायला हवी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा