मंगळवार, १८ मे, २०१०

मनाचे श्लोक

माझ्या लहानपणची गोष्ट. तेंव्हा मी सहावी सातवीत असेन. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी रामदासस्वामींच्या "मनाच्या श्लोकांवर" भाषण तयार करायचं होतं. मी घरी येऊन आई बाबांना स्पर्धेबद्दल सांगितलं. शाळेत आणि घरी जेवढे काही श्लोक पाठ करून घेतले होते, तेवढे माझे चोख पाठ होते. त्यामुळे आपला अगदी हातखंडा असलेल्या एका विषयावर आपल्याला भाषण लिहायचेय, अश्या काहीश्या भ्रमात मी होते हे आठवतंय. मग बाबांच्या मदतीनी भाषणाचे सगळे मुद्दे काढले. त्यांच्याच मदतीनी मुद्देसुद बांधणी केली आणि स्पर्धेमधे छान भाषण देऊन आले. स्पर्धेचा निकाल लागला. मला त्यात पहिलं बक्षिस मिळालं. खरंतर जवळ जवळ सगळं श्रेय बाबांचंच होतं. तरी घरी आणि शाळेत माझंच खुप कौतुक झालं. आपल्या वक्तृत्व कौशल्या बरोबरच श्लोकांच्या पाठांतरामुळे आपल्याला हे बक्षिस मिळालं, म्हणजे मनाचे श्लोकही आपल्याला कळलेत अशी माझी पक्की समजूत झाली.
या गोष्टीला 20 वर्ष होउन गेली. माझी मुलगी अवनी सहा वर्षाची झाली. शाळेत हिन्दी भाषा शिकत असल्यामुळे तिला मराठीही वाचता येत होतंच. म्हणून मग संध्याकाळी शुभंकरोतिच्या जोडीनं मी तिला आता थोडे थोडे मनाचे श्लोक वाचायला शिकवायला लागले. तिला सुद्धा हे श्लोक रोज म्हणायला, मधून मधून त्याचा अर्थ समजुन घ्यायला खूप आवडत होतं. मी माझ्या परीनी मला जमेल तसा सोप्या शब्दात तिला अर्थ सांगत गेले. एकीकडे असंही वाटत होतं की तिचं हे वय तर परीकथेच्या, राजा-राणीच्या विश्वात रमण्याचं आहे. इतक्या लहान वयातच आपण तिच्यावर ह्या विचारांचं ओझं तर नाही न लादत?
अवनीच्या शाळेत मधे एकदा कसली तरी स्पर्धा होती. त्यात तिच्या एक मैत्रिणीला बक्षिस मिळालं.
घरी आल्यावर अवनी मला म्हणाली, "आई खरं म्हणजे मला आधी थोडं वाईट वाटलं की मला नाही बक्षिस मिळालं. पण नंतर मलाच आठवलं, रामदास स्वामींनी लिहिलय न 'नको रे मना मत्सरू दंभभारू'. म्हणून मग मला काही जेलस नाही वाटलं नंतर."
मनाच्या श्लोकाचा अर्थ इतक्या लहान वयात आत्मसाद करणं कुठून जमलं असेल हिला? पेराल ते उगवतं म्हणतात ते हेच का?
मनाच्या श्लोकांनी मला आज खूप काही दिलं.
वक्तृत्व स्पर्धेतला माझ्या त्या पहिल्या बक्षिसापेक्षा कितीतरी मोलाचं!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा