आई इथे जपानला तीन महिन्यांसाठी आली होती. त्यात नेमकी शेवटचा महिनाभर आजारी पडली. दवाखान्यात अनेक टेस्ट्स झाल्या आणि काविळीचं निदान झालं. जपानमधे आता कावीळ अस्तित्वात नाहीये, त्यामुळे ती का झाली असावी आणि त्यावर औषध योजना काय, ह्यावर इथल्या डॉक्टरांनी भरपूर काथ्याकुट केला. आणि शेवटी ती भारतात जाई पर्यंत म्हणजे पुढचे तीन आठवडे रोज तीन सलाइन घेण्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन यायला सांगितलं. तिला घेऊन रोज मी आणि वहिनी दवाखान्यात जात होतो.
आई तशी एकदम खंबीर बाई आहे आणि त्यातून ती फारशी आजारी पडत नाही. पण कधी जर क्वचित काही झालं तर मात्र ते आजारपण तिला एरवी सारखं खंबीरपणे घेता येत नाही. आधीच आजारपणामुळे भरपूर अशक्तापणा आलेला. त्यातून परक्या देशात मुलाकडे आणि मुलीकडे आल्यावर आपल्याला आजारपण यावं, हे डॉक्टर आपल्या विषयी काय बोलतायत ते कळत नाही ह्यामुळे ती अजुनच ढेपाळून गेली.
डॉक्टरांनी कुठल्याही नवीन टेस्ट करायला सांगितल्या की ही आधी भीतीनी "नाही" म्हणायची. मग आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकजण त्या टेस्टलाही तिच्याबरोबर आत जायचो. मधुनच ती "कशाला रोज सलाइन? म्हणतात की कावीळ होते आपोआप बरी" असं म्हणायची. मग आई आणि डॉक्टर ह्या दोघांनाही एकमेकांची मतं समजावून सांगत बसायचो.
रोज तीन सलाइन म्हणजे साधारण पाच तास लागायचे. मग आमच्या मुलांच्या शाळा आणि बाकी अॅकटिविटिजच्या वेळा सांभाळून आम्ही दवाखान्याच्या चकरांचं वेळापत्रक आखलं. शनिवार रविवार नवरा आणि भाऊ हे दोघंही मदतीला असायचे.
दरम्यान रोज दवाखान्यात जाऊन जाऊन पहिल्या आठवड्याभरात तिथले रोज किंवा नेहमी येणारे चहरे ही ओळखायला लागले. सगळ्या जपानी जनतेत आमचं भारतीय कुटुंब, विशेषतः आई तिच्या पंजाबी ड्रेस आणि कुंक ह्यामुळे उठून दिसायची. मग तो सलाइनचा "मोबाइल" स्टँड हातात धरून हळुहळु चालत बाथरुमला वगैरे जायला आम्ही तिला मदत करायचो. बाहेर बसलेले लोक, खास करून म्हातारी माणसं, नेहमी त्या वेळेला आमच्याकडे बघत बसायचे. सुरुवातीला "या भागात परदेशी लोक फारसे दिसत नाहीत म्हणून इतकं कुतुहलानी बघत असतील" असं आम्हाला वाटायचं. पण थोड्याच दिवसात हे "उठून दिसणं" केवळ परदेशी लोक आहेत म्हणून नाही तर आमच्या सतत आईच्या अवतीभवती असण्यामुळे, तिला सगळीकडे कंपनी देण्यामुळे आहे हे हळुहळु लक्षात यायला लागलं.
आजुबाजुला बघितल्यावर जाणवलं ही ह्यातली बहुसंख्य वयस्कर लोकं कोणाच्याही सोबतीशिवायच आलेली असत. मग ते निम-म्हातारे असोत की अगदी जख्ख म्हातारे! कधी कधी एखादं म्हातारं जोडपं एकमेकांच्या साथीनी यायचं. ते दोघंही इतके थकलेले की कोण कोणाला सोबत करतंय हा प्रश्न पडावा. एंडोस्कोपी, सिटी स्कॅन किंवा एक्सरे विभागाच्या बाहेरही ही लोकं इतकी शांतपणे बसलेली असायची की जणू काही विमानात चढायची घोषणा होण्याची वाट बघतायत. काहीजणं आपापला सलाइनचा चालता- फिरता स्टँड घेउन सोफ्यावर निवांत बसून टिव्ही बघत असत. जसं काही टिव्ही बघणं हे खरं काम आहे आणि फावल्या वेळात सलाइन उरकून घेतायत.
आम्हाला नेहमी कुतूहल वाटायचं की ह्यांच्या बरोबर दवाखान्यात यायला घरातल्या कोणालाच वेळ कसा नाही? गेल्या १० वर्षात इथल्या जीवन पद्धतीची कितीही सवय झाली असली तरी आजारी माणसानी दवाखान्यात एकटंच यायचं ही कल्पना पचनी पडायला जरा अवघडच गेली.
ह्यामधे कुठेही दोन परस्पर भिन्न समाजाची तुलना करण्याचा हेतु निश्चितच नाही. मला टिपिकल भारतीय चष्म्यातून ह्यांच्याकडे बघताना एकीकडे त्यांचं दवाखान्यात एकट्यानी येउन सगळं आपापलं manage करणं हे किंचित "बिचारं" वाटायचं. पण तरी त्यांच्या वागणुकीतुन मात्र ते कुठेच नाही दिसलं. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
जपानी लोकांना त्यांच्या चष्म्यातून आम्हा भारतीय रुग्णांकडे बघताना नक्की काय वाटत असेल?


1 टिप्पणी(ण्या):
छान लेख! मला वाटतं की अगदी लहानपणापासूनच त्यांना स्वावलंबन शिकवले जात असावे.
टिप्पणी पोस्ट करा