मंगळवार, १८ मे, २०१०

मनाचे श्लोक

माझ्या लहानपणची गोष्ट. तेंव्हा मी सहावी सातवीत असेन. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी रामदासस्वामींच्या "मनाच्या श्लोकांवर" भाषण तयार करायचं होतं. मी घरी येऊन आई बाबांना स्पर्धेबद्दल सांगितलं. शाळेत आणि घरी जेवढे काही श्लोक पाठ करून घेतले होते, तेवढे माझे चोख पाठ होते. त्यामुळे आपला अगदी हातखंडा असलेल्या एका विषयावर आपल्याला भाषण लिहायचेय, अश्या काहीश्या भ्रमात मी होते हे आठवतंय. मग बाबांच्या मदतीनी भाषणाचे सगळे मुद्दे काढले. त्यांच्याच मदतीनी मुद्देसुद बांधणी केली आणि स्पर्धेमधे छान भाषण देऊन आले. स्पर्धेचा निकाल लागला. मला त्यात पहिलं बक्षिस मिळालं. खरंतर जवळ जवळ सगळं श्रेय बाबांचंच होतं. तरी घरी आणि शाळेत माझंच खुप कौतुक झालं. आपल्या वक्तृत्व कौशल्या बरोबरच श्लोकांच्या पाठांतरामुळे आपल्याला हे बक्षिस मिळालं, म्हणजे मनाचे श्लोकही आपल्याला कळलेत अशी माझी पक्की समजूत झाली.
या गोष्टीला 20 वर्ष होउन गेली. माझी मुलगी अवनी सहा वर्षाची झाली. शाळेत हिन्दी भाषा शिकत असल्यामुळे तिला मराठीही वाचता येत होतंच. म्हणून मग संध्याकाळी शुभंकरोतिच्या जोडीनं मी तिला आता थोडे थोडे मनाचे श्लोक वाचायला शिकवायला लागले. तिला सुद्धा हे श्लोक रोज म्हणायला, मधून मधून त्याचा अर्थ समजुन घ्यायला खूप आवडत होतं. मी माझ्या परीनी मला जमेल तसा सोप्या शब्दात तिला अर्थ सांगत गेले. एकीकडे असंही वाटत होतं की तिचं हे वय तर परीकथेच्या, राजा-राणीच्या विश्वात रमण्याचं आहे. इतक्या लहान वयातच आपण तिच्यावर ह्या विचारांचं ओझं तर नाही न लादत?
अवनीच्या शाळेत मधे एकदा कसली तरी स्पर्धा होती. त्यात तिच्या एक मैत्रिणीला बक्षिस मिळालं.
घरी आल्यावर अवनी मला म्हणाली, "आई खरं म्हणजे मला आधी थोडं वाईट वाटलं की मला नाही बक्षिस मिळालं. पण नंतर मलाच आठवलं, रामदास स्वामींनी लिहिलय न 'नको रे मना मत्सरू दंभभारू'. म्हणून मग मला काही जेलस नाही वाटलं नंतर."
मनाच्या श्लोकाचा अर्थ इतक्या लहान वयात आत्मसाद करणं कुठून जमलं असेल हिला? पेराल ते उगवतं म्हणतात ते हेच का?
मनाच्या श्लोकांनी मला आज खूप काही दिलं.
वक्तृत्व स्पर्धेतला माझ्या त्या पहिल्या बक्षिसापेक्षा कितीतरी मोलाचं!

गुरुवार, १३ मे, २०१०

एक अनुभव भातशेतीचा

मार्च महिना सुरु झाला. झाडं पुन्हा एकदा पानाफुलांनी नटली. हुश्श! एकदाचा वसंत ऋतू आला.
आता थंडी हळूहळू कमी होउन हवा छान उबदार होणार म्हणून आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
थंडीचे सगळे दिवस या वसंताच्या वाटेकडे डोळे लावूनच काढले होते.
एप्रिलचा शेवट आणि मे चे पाहिले ३-४ दिवस अशी जोडून सुट्टी असलेल्या "गोल्डन वीक" चे वेध आता लागले. सुट्टीत सगळ्यांचे कुठे कुठे जायचे बेत ठरायला लागले.
"या वर्षी आपल्याला 'नाकाजिमा' आणि 'हातानो' या दोन जपानी कुटुंबाबरोबर एक दिवस भातशेती करायला जायचंय" असं एक दिवस हेमंतनी जाहीर केलं. त्यातले नाकाजीमा हे हेमंतचे कलीग आणि हातानो हे नाकाजिमांचे family friend. नाकाजिमा आणि हातानो यांच्या मुली अनुक्रमे 'हानाए' आणि 'तोमोका' ह्या दोघी अवनीच्या बरोबरीच्या. त्यामुळे ती पण अगदी खूष होती.
ही सगळी लोकं गेली ३ वर्ष ह्या शेतात पेरणी, कापणी, मळणी ह्या कामांना जातायत.
आमचा हा पहिलाच अनुभव. आत्तापर्यंत भात पेरणं फक्त सिनेमात बघितलेलं किंवा गो नी दांडेकरांच्या पुस्तकात वाचलेलं. त्यामुळे आम्हाला जबरदस्त excitement होती. त्यातून शहरी धावपळीपासून दूर खेड्यात जायचं आकर्षणही होतंच.
नाकाजीमांनी अगदी टिपिकल जपानी पद्धतीनी दोन दिवसांच्या ट्रिपची रूपरेषा आम्हाला आधीच देऊन ठेवली होती. त्यांनी दिलेल्या यादीनुसार सामान घेऊन आमच्या पहिल्या-वहिल्या शेतकामासाठी सज्ज झालो.
फार ट्राफिक मधे अडकायच्या आत पोहोचावं म्हणून सकाळी सकाळी लवकरच निघालो.
पण आमच्या सारखाच विचार खूप लोकांनी केलेला दिसत होता. त्यामुळे २ तासांच्या अंतरावर पोचायला आम्हाला तब्बल ६ तास लागले. शेवटी एकदाचे आम्ही २ वाजता इप्सित स्थळी पोचलो. मग भरपेट जेवून आणि समुद्रावर मनमुराद भटकून संध्याकाळी आम्ही गेलो आमच्या राहाण्याच्या ठिकाणी. तिथे अजून एक मजेदार कार्यक्रम आमची वाट बघत होता तो म्हणजे वेजिटेरियन सुशी तयार करण्याचा.
रात्रीच्या जेवणाला ज्या सुशी असणार होत्या त्यातल्याच काही आम्हाला तयार करायच्या होत्या. सुशी तयार करणं हे किती नाजुक, कलाकुसर असणारं आणि तितकंच खटपटीचं काम आहे हे तेंव्हा कळलं. एक आजी सुशी करायला शिकवत होत्या आणि २/३ आज्या आम्हाला मदत करत होत्या.



रात्रीचं जेवण हा एक खूप सुखद अनुभव होता. जेवणाच्या आधी त्या भातशेताच्या सगळ्या ट्रस्टीज आणि इतर मंडळींशी ओळख परेड, कोण जपानच्या कुठल्या कुठल्या भागातून आलाय त्याची माहिती आणि मग जेवणाच्या जोडीला पोटभर अनौपचारिक गप्पा! ही सगळी ५० ते ६० लोकं मिळून आम्ही उद्या एकत्र काम करणार होतो. जपानी माणसं इतकी मनमोकळी आणि अनौपचारिक वागताना मी बहुदा पहिल्यांदाच बघितली. कदाचित खेड्यातल्या मोकळ्या वातावरणानी ही माणसंही इतकी मोकळी झाली असावीत. बराच वेळ गप्पा चालल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर पायात मोट्ठे रबरी बूट चढवून आम्ही सगळे औट घटकेचे शेतकरी निघालो खाचरांमधे भात पेरायला. तिथल्या शेतकरी आजी आजोबांनी आम्हाला पेरणी कशी करायची ते आधी नीट समजावून सांगितलं. भाताची ४ ते ५ रोपं एका वेळी घेवुन ती पेरायाची, रोपांमधे १० ते १५ सेटींमीटरचं अंतर ठेवायचं हे सगळं नीट समजावून घेतलं. आता उत्साहानी खाचरात पाय घातला. तो अपेक्षेपेक्षा खूपच खोल गेला. हे काम वाटतंय तेवढं सोपं नाही हे लक्षात आलं. मग दबकत दबकत आम्ही कामाला लागलो. हळूहळू कामाला वेग येत गेला. अधुन मधुन कुणी कुणी चुकत होतं. मग साधारण सत्तरीच्या घरातल्या एक कडक आजीबाई त्यांना ओरडत होत्या. लहान मोठं कोणाचीच चूक त्यांच्या तीक्ष्ण नजरेतुन सुटत नव्हती. अवनी, हानाए आणि तोमोकानी सुद्धा प्रसंगी आजींची बोलणी खात जवळ जवळ अडीच तास आमच्या बरोबर काम केलं.





पेरणी झाल्यावर मग तिथेच सगळ्यांसाठी जेवण होतं. ते करून मग मुली गेल्या गवतात नवनवीन कीडे शोधायला. काही कीडे त्यांनी खास किड्यांसाठी असलेल्या बास्केट मधेही गोळा केले. हानाएच्या मदतीनी अवनीनी चक्क छोटे बेडूक सुद्धा पकडले.



जेवण, गप्पा झाल्यावर काल नव्यानीच ओळखी झालेल्या सगळ्यांचा निरोप घेऊन, आम्ही ३ कुटुंबांनी तिथुन प्रस्थान केलं.
जेवणाआधी जरी चिखलाचे हातपाय धुतले होते तरी म्हणावं तसं समाधान नव्हतं झालं. म्हणुन मग पुढे आम्ही गेलो ओनसेन म्हणजेच हॉट स्प्रिंगज मधे आंघोळ करायला. हॉट स्प्रिंगज मधे relax होणं हा खरंच एक सुखद अनुभव असतो. आणि त्यानंतर जपानी पद्धतीचं गरम गरम जेवण म्हणजे तर आहाहा!
आता हळूहळू आवरून निघायची वेळ झाली.
२ दिवस कसे गेले कळलंच नाही. एवढं भटकलो, काम केलं तरी थकवा आला नाही. गोल्डन वीकच्या सुट्टीचा अनुभव खरोखरच "गोल्डन" होता.